
जळगाव टाइम्स प्रवीण परदेशी
विसर्गही वाढला : पारोळा, एरंडोल, धरणगाव तालुक्यांतील शेतकरी सुखावले
जळगाव : गुढे ते खेडगाव (ता. भडगाव) दरम्यान असलेल्या रस्त्यावर एका पुलाचे काम रखडल्याने गिरणेच्या आवर्तनाचा विसर्ग अतिशय संथगतीने सुरू होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाच्या कामातून आवर्तनासाठी वाट करून देण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटचारी मोकळी करून दिली आहे. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने गिरणा, अंजनी, बोरीकाठचा शेतकरी सुखावला आहे.
जामदा डावा कालव्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे पर्यायी रस्ता उभा करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या भरावाच्या ठिकाणी कमी क्षमतेचे पाईप टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गिरणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या विसर्गासाठी मर्यादा आल्या होत्या. त्यासोबतच कालवा फुटीचा धोकाही निर्माण झाला होता. यासंदर्भात गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली. त्याउपर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाखालच्या कालव्याची वाट मोकळी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या पुलाखालचा कालवा मोकळा झाल्याने आता पाण्याचा परिपूर्ण विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणगाव, पारोळा, एरंडोल तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.